Sunday, November 13, 2016

Pinkathon.. A Run with a Cause..

नमस्कार,

जनरली रविवार म्हटले की डोळ्यासमोर शुद्ध आराम आणि शून्य काम असे सुट्टीचे चित्र उभे राहते. पण आजचा रविवार समस्त पुणेकरांसाठी (खास करून महिलावर्गासाठी) अगदी वेगळा उगवला होता. निमित्त होते मिलिंद सोमण गेली तीन वर्षे यशस्वीपणे ऑर्गनाईझ करत असलेल्या "Pinkathon" या मॅरेथॉनचे.

कालचा शनिवार हा रविवार पहाटे दीड पर्यंत लांबला होता. "वजनदार" हा मस्त फील गुड चित्रपट, त्यानंतर निवांतपणे झालेले मनपसंद डिनर आणि हे कमी म्हणून की काय, मला लागलेले जिलेबी-रबडीचे डोहाळे (!!!) पुरवण्यासाठी नवरोजींनी रात्री बारा पर्यंत केलेली मॅरेथॉन गाडी-पीट ! (इतके करूनही शेवटी गुलाबजाम-रबडीवर समाधान मानावे लागले तो भाग अलहिदा.) घरी साडेबाराला पोचल्यावरही चिरंजीव टक्क जागे असल्यामुळे त्यांच्याबरोबर टिवल्याबावल्या करण्यात रात्रीचा दीड वाजला. त्यावेळी पावणेपाचचा गजर लावताना अगदी जीवावर आले होते. गजर प्रामाणिकपणे वाजल्यावर "आता ह्याचा गळा घोटावा का?" असा क्रूर विचारही एक क्षण मनात येऊन गेला. पण अशा मोहाच्या क्षणांवर विजय मिळवला तर अमर्याद आनंदप्राप्ती होते अशी काहीशी स्वरचित (किंवा दुसऱ्या कोणाचीही, doesn't matter) सुभाषिते आळवत निमूटपणे स्वतःचे आवरून माझ्या सखिलाही जागे केले आणि महत्प्रयासाने पहिला गिअर टाकला.  साडेपाचला ग्राउंडवर पोचले तर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. थोड्या लांब एका बोळात गाडी कशीबशी घुसवली आणि पार्किंग मिळाल्यावर स्वर्गाचे तिकीट मिळाल्याच्या आनंदात मुख्य व्हेन्यूकडे जायला निघाले.


एखाद्या समारंभाला आल्यासारख्या नटून-थटून, आणि पळण्याची जय्यत तयारी करून आलेल्या ललना, चिमुरड्या आणि आजीबाई पाहिल्यावर अंगात उत्साह न संचारता तरंच नवल. त्यातील कित्येकांची ही पहिलीच मॅरेथॉन होती. सगळ्या वातावरणातच  Pinkathon चे गारुड भरून राहिले होते. प्रत्यक्ष रेस जरी सातच्या आसपास सुरु होत असल्या तरी आधीचा तासभर झुम्बा आणि वॉर्म अप. स्टेज वर झुंबा करणारे कलाकार रबराचे बनले असल्यागत अविरत थिरकत होते. त्यांच्या स्टेप्सशी मॅच करताना आमच्यासारख्या पामर वृद्धांची तारांबळ उडत होती. पण कोणीही आपल्याला बघत नाहीये, जज्ज करत नाहीये, आणि सर्वजण स्वतःतच रममाण झालेत, हे पाहून मनसोक्त नाचून घेतले. स्वतःला मोकळे करण्यासारखा दुसरा आनंद नाही हे खरे. प्रत्यक्ष रनिंग ३ किमी चे असले तरी एकूण चालणे/धावणे झाले ९ किमी इतका IISER चा कॅम्पस भव्य आहे. माझ्यासारख्या असंख्य जणींची रेस होती स्वतःशीच. स्वतःला आजमावण्यासाठीच. आपण हे करू शकतो या जाणीवेची शिदोरी जमवण्यासाठी. रेस संपल्यावर "Yes, I did it !!" हा क्षण किती सुखद असतो नं?


गेली तीन वर्षे मिलिंद सोमण हे गुणी व्यक्तिमत्व या मॅरेथॉनच्या माध्यमातून brest cancer विषयी जागृती करत आहे. एकंदरीतच निरोगी जीवनशैलीचा व्यायाम हा किती महत्वाचा भाग आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी रुजवलेल्या कल्पनेचा आता वटवृक्ष झाला आहे. Pinkathon ही केवळ स्पर्धा नं राहता तो एक ब्रॅन्ड झाला आहे. पुढील वर्षी  मी ५ किमी धावण्याचा संकल्प केला आहे. तोपर्यंत See you Pinkathon !!!




Friday, August 5, 2016

Worries, Weight-Issues, Waste-in-brain??... Just Walk Them Off !!! :)

  नमस्कार,

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केलाय. अनेक दुर्घटना घडतायत आणि मन खंतावतंय. आपण काही करू शकत नाही आणि तरीही वाईट वाटतंच... असो.

गेले दोन तीन दिवस पावसामुळे बाहेरच पडावेसे वाटत नव्हते. त्यात सिझनल आजारपणामुळे घ्याव्या लागलेल्या अँटीबायोटिक्सनी पोटात धुडगूस घातलाय. खावेसे वाटतेय पण ऍसिडिटी होतेय, झोप येतेय, काम होत नाहीये, ऑफिसला जाता येत नाहीये आणि व्यायाम तर मागच्या जन्मीच केला होता बहुतेक... चिडचिड होतेय.

शेवटी आज, घरातल्या दोन मुलांना शाळा आणि कामावर धाडून , मनाचा हिय्या करून बाहेर पडले. जोरदार पाऊस, वारा, आजारपण या कशाचीही पर्वा नं करता. ठरवलेच होते, जमेल तेवढे चालायचे. एक पाऊल आणि मग दुसरे ... स्वतःतून बाहेर पडून, डोळे उघडे ठेऊन फक्त माणसे अनुभवायची ....

ती पहा, एक कन्या, बाईकवर स्वार होऊन एका फळ-विक्रेत्यांशी सुमारे पावणेदोन रुपयांसाठी पाच मिनिटे हुज्जत घालत आहे. पै पै वाचवून संसार करणाऱ्या त्या मातामाऊलीला माझा साष्टांग दंडवत !!

थोडे पुढे गेल्यावर ते पहा एक आजोबा.. गेल्या सव्वापस्तीस वर्षांचा सकाळी चालण्याचा दिनक्रम चुकू नये म्हणून आजही बाहेर पडले आहेत. एका हातात मेथीसदृश्य भाजीची पिशवी, छत्री आणि दुसऱ्या हातात?  अगदी बरोबर - पुण्याचा जगप्रसिद्ध "सकाळ" पेपर. :) तमाम पुणेकरांना चहाबरोबर सकाळ लागतोच. सर्व गोष्टींचा तोल सांभाळताना आजोबांच्या हातातून सकाळ निसटतो. कोणीतरी पटकन पुढे होऊन त्यांना तो उचलून देते पण तोपर्यंत पेपरमधील सर्व बातम्या "पाण्यात " गेलेल्या असतात. आता आजोबाना बहुदा इस्री मारून पेपर वाचावा लागणार !

अरेच्या, हा रेनकोट काय बरं करतोय रस्त्यावर?? अच्छा, आतमध्ये एक दप्तर पण आहे वाटतं ! आणि त्या दप्तराच्या ओझ्याआड एक १२-१५ किलोचा गुंडगोळा पण. चेहेऱ्यावर शुद्ध नाईलाज घेऊन ते पोरं शाळेत नेणाऱ्या बसची वाट बघत उभं आहे. "दप्तर फेकून द्यावे, रेनकोट काढून टाकावा, आणि पावसात मनसोक्त (आईने एक धपाटा देईपर्यंत तरी ) हुंदडावे " या त्याच्या मनातील भावना त्याच्या चेहेऱ्यावर अगदी स्पष्ट वाचता येत आहेत. बच्चमजी, आज तरी  तुम्ही जात्यात आणि (मला ऑफिसला जायचे नसल्यामुळे) मी सुपात बरं का !! त्याला टुकटुक करण्याची उर्मी मनात दाबून ठेवत मी गार वारा आणि श्रावणसरी पुन्हा अनुभवायला लागते.

सुमारे एक तास आणि पाच किलोमीटर अंतर पार करून मी घरी येते तेंव्हा आरशातली मी कोणीतरी वेगळीच असते. अनेक चिंता, कटकटी, त्रागा, कशा कशाचा लवलेशही नसतो. तुम्ही अनुभवलंय असे काही ???












Thursday, July 21, 2016

Zootopia... Anyone can be Anything !!!

नमस्कार,

गेली दोन तीन वर्षे आमच्या कुटुंबाचा (मी, पतिदेव, व चिरंजीव ) एक रिवाज ठरून गेलाय जसा काही. वीकेंड्स ना जर दूरवर फिरायला जायचे नसले तर सरळ एखादा 'पिक्चर टाकायचा'. म्हणजे अतिरेकी चिकित्सा नं करता मनाचा कौल घेऊन निघायचे. शक्यतो पाटी कोरी ठेऊन. आणि गंमत म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलाच अनुभव येतो. त्यात पुत्ररत्न जसजसे मोठे होत आहे तसतसे त्याचे मत हे 'भरतवाक्य' होत आहे. पर्यायाने गेल्या काही वर्षातले जवळपास सर्व ऍनिमेशन चित्रपट बघून झाले आहेत. त्यातले एक-दोन तर फ्रेम- टू-फ्रेम पाठ झाले आहेत. पण खरं सांगू का? सुरुवातीला 'काय ते लहान मुलांचे चित्रपट बघायचे? ' अशी कुरकुर करणारे आम्ही आता 'मोठ्या माणसांच्या बऱ्याच वेळेला अर्थहीन (आणि बिनडोक)चित्रपटांपेक्षा लहान मुलांचे निर्व्याज आनंदी चित्रपट खूप चांगले' अशा मताचे झालो आहोत. त्यात ते 3D असले तर दुधात साखर. :)

या मांदियाळीतला मला सर्वांत आवडलेला चित्रपट - Zootopia .. .!!  Rotten Tomatoes वर 90 % पेक्षा जास्त positive reviews मिळालेला, आणि जाणकारांच्या मते Disney चा २० वर्षांतील सर्वात सुंदर चित्रपट. अर्थात हे नंबर्स मला चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळवताना कळले बरं का ! चित्रपट बघायला जाताना नेहेमीप्रमाणेच पूर्णपणे अज्ञातात उडी घेतली होती. आणि काय सांगू महाराज, पहिल्या फ्रेम पासूनच चित्रपटाने मनाचा असा ठाव घेतला की ज्याचे नाव ते. लहानांना आवडणारे आणि मोठ्यांसाठीही अतिशय प्रेरणादायी ठरतील अशा चित्रपटांमध्ये झूटोपियाचे नाव नक्की घेतले जाईल यात शंका नाही.

एक आटपाट नगर - झूटोपिया. तिथे सगळे प्राणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्या नगरातलाच एक गुणी ससा (की मिस. ससा : ) ) तिचे स्वप्न आहे पोलीस ऑफिसर व्हायचे. त्याप्रमाणे अपार कष्ट करून ती आपले ध्येय साध्य करते. मग तिची नेमणूक शहराच्या मध्यभागी असलेल्या सिटी सेंटर या भागात होते. त्या शहराचा पोलीस मुख्यायुक्त चीफ बोगो याच्यासमोर १४ बेपत्ता झालेल्या प्राण्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्राणी भक्षक वर्गातले आहेत. भवती नं भवति करत ह्या केसची थोडीशी जबाबदारी ज्युडी कडे (ससा) येऊन पडते. या केसवर काम करताना तिला प्राण्यांचे जे असंख्य मुखवटे आणि मुखवट्यामागील चेहरे दिसतात त्या सगळ्याची गोष्ट म्हणजे हा नितांतसुंदर चित्रपट. थिएटर मध्ये दोन वेळा बघूनही समाधान नं झाल्यामुळे त्याची डीव्हीडी विकत घेऊन टाकली आहे आणि तीसुद्धा तीन चार वेळा बघून झाली आहे.
या चित्रपटातली सर्वच पात्रे - Nick Wilde, Judy Hopps, Chief Bogo, Clawhauser, Mr. Big, Finnick, Flash, Gazelle - अगदी प्रेमात पडावे अशी आहेत. प्रत्येकाचं असं एक वैशिष्टय आहे.  ते इथे सांगून चित्रपटातली मजा घालवायची नाही मला अर्थात. या चित्रपटाचे Animation आणि Voice over चा मात्र आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या चित्रपटाचे सार शकीराने गायलेल्या गाण्यात आहे - 

I messed up tonight
I lost another fight
I still mess up but I'll just start again
I keep falling down
I keep on hitting the ground
I always get up now to see what's next
Birds don't just fly
They fall down and get up
Nobody learns without getting it wrong

I won’t give up, no I won’t give in
Till I reach the end
And then I’ll start again
Though I’m on the lead
I wanna try everything
I wanna try even though I could fail

नक्की बघा हा चित्रपट. आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास अंगी रुजवण्यासाठी.... !!!!






Friday, July 15, 2016

पाऊले चालती...

नमस्कार,

पावसाळा म्हटला की आषाढ-श्रावण हीच जोडगोळी जास्त आठवते. त्यात श्रावणाचे पारडे अनेकविध भावगीतांमुळे जड वाटत असले तरी आषाढाचा एक वेगळा रुबाब आहे. गुरुपौर्णिमा, दिवली अमावस्या, कांदेनवमी आणि "बडा ख्याल" म्हणजे आजची आषाढी एकादशी.

वर्षभर कोणतीही व्रतवैकल्ये नं पाळणारे कितीतरी जणही आषाढी एकादशीचा उपास आवर्जून पाळतात. घराघरात all time hit खिचडी, रताळ्याचा किस, मिठाई, वरीतांदूळ, दाण्यांची आमटी, भोपळ्याचे भरीत, काकढीची कोशिंबीर असे अनेक चविष्ट बेत शिजत असतात. जिकडे ऐकावे तिकडे संतांचे अभंग कानावर पडत असतात.

तिकडे पंढरपुरात तर चंद्रभागेला पूर आलेला असतो.   "मेळा गोपाळांचा" डाव मांडलेला असतो. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आणि तो सावळा विठुराया विटेवर उभा राहून हे सर्व न्याहळत असतो. त्याचे दर्शन हे कित्येकांसाठी आयुष्यभराचे समाधान असते.

मी "देव देव" पंथातली किंवा उपास तपास पाळणारी नव्हे हं. पण या वेळी जो अनुभव आला तो आवर्जून शेअर करावासा वाटला. तो अनुभव होता माणसांच्या प्राणशक्तीचा, त्यांच्या झपाटलेपणाचा, त्यांच्या देह धर्म विसरायला लावणाऱ्या भाबड्या श्रद्धेचा.

दिवस २९ जून. पुण्यात वारीचे आगमन होणार होते. माझे ऑफिस येरवड्यात आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे, त्यामुळे आधीच ऑफिस कडून खबरदारीच्या, वारीचा मार्ग वर्णन करणाऱ्या मेल्स आल्या
होत्या. माझ्या टीम मधील जवळपास सर्वजण work from home करत होते. आमचे नवरोजी आणि चिरंजीवही सुखेनैव घरी बसले होते. पण त्या दिवशी का कोण जाणे, मी ऑफिस ला आले. माझ्या टीम मधील एकमेव उपस्थित colleague मला लवकर घरी जायचा सल्ला देत होता.   त्याप्रमाणे माझा कॉल संपवून मी सव्वादोनच्या सुमारास घरी जायला निघाले. रस्त्यावर आल्यावर जाणवले की जवळपास सगळे मार्ग गाड्यांसाठी बंद आहेत. कोणत्याही मार्गावरून गेले की वारकऱ्यांचा जत्था नजरेस पडे आणि माझी गाडी त्याच स्पीडमध्ये जात होती. जणू मी सुद्धा वारीबरोबर चालले आहे. भवति नं भवति करत सव्वाचारच्या सुमारास (बरोबर दोन तासांनी) पुन्हा ऑफिस मध्ये आले. काही खाऊन घेतले आणि साडेचारला पुन्हा प्रयत्न करू म्हणून बाहेर पडले. माणसांची संख्या दहा पट झाली होती. कोणत्याही रस्त्यावरून बाहेर पडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो बंद होत होता. त्यात माझे पुण्यातील रस्त्यांचे ज्ञान अगाध आहे.  थोडा वेळ स्वतःवर आणि वातावरणावर चिडचिडून झाल्यावर शेवटी मानाने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मग नकळतच वैतागाचें रूपांतर कुतूहलात झाले. स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूला बघायला लागले. काय चैतन्य भरले होते वातावरणात... अक्षरशः भारावून गेले. ती अपरिमित एनर्जी गाडीच्या बंद काचांमधूनही येऊन खोलवर भिडत होती. हजारो लोक एक अपरिचित ओढीने डोक्यावर तुळस किंवा विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती घेऊन चालत होते. काहीजण अभंग म्हणत चालले होते. सर्वांचे चेहरे प्रसन्न, तृप्त,.. कसली तक्रार नाही की वखवख नाही. एक माणूस घराच्या अंगणात उभे राहून सर्व वारकऱ्यांना चहाचे आमंत्रण अगदी आग्रहाने देत होता. सर्वजण एकमेकांना नमस्कार करत होते आणि पुन्हा मार्गस्थ होत होते. हजारो गाड्यांमध्ये अडकलेली माझीही एक आणि बाजूने लाखो माणसांचा समुदाय चाललेला. त्या energy चे गारुड इतके होते की क्षणभर "गाडी इथेच ठेऊन या सर्वांबरोबर चालत राहावे" अशी आंतरिक उर्मी दाटून आली. त्याक्षणी मला सच्च्या वारकऱ्यांची तळमळ मनापासून जाणवली व भिडली.

शेवटी साडेनऊला (बरोबर ५ तासांनी) घरी पोचले तेंव्हा घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवऱ्याने डिवचलेही - जाशील आता पुन्हा या दिवशी ऑफिस ला? मी हसून वेळ साजरी केली. कदाचित नाही जाणार... पण या दिवसाचे दान कसे व्यक्त करू शब्दात?? ऑफिस ला जाण्याच्या निर्णयाचा पश्चताप होतोय? - त्रिवार नाही.... !!!
कारण माणसातला विठ्ठल मला दिसला की हो त्या दिवशी .... !!!

सर्वाना आषाढीच्या मनापासून शुभेच्छा....!!!!!
























Wednesday, July 13, 2016

किल्ला.. आठवणींचा आणि अनुभवांचा....

नमस्कार,

सध्या सगळीकडे अगदी नभ उतरू आलं आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस आणि मन चिंब करणाऱ्या आठवणी - कसं अलवार आणि अतूट नातं. शाळेत असताना हिरव्यागार गवतात फुलपाखरांशी केलेली दंगामस्ती, भिजून कुडकुडत घरी येणे आणि नेमके लाईट नसणे. मग काळोखातच आईच्या हातचे गरमागरम जेवण, तिचा प्रेमळ स्पर्श. मग माळ्यावर बसून कानात साठवलेला तो पावसाचा घनगंभीर आवाज.

बाहेर पाऊस कोसळतोय.. वेड्यासारखा. मन आंदोळतय आठवणींच्या झुल्यावर.. आणि टीव्ही वर चित्रपट चालू होतो - किल्ला ....

एक आठवीत शिकणारा मुलगा. वडील नुकतेच गेलेले. आईवर स्वतःला आणि या मुलाला सावरण्याची दुहेरी जबाबदारी. त्यात तिची कोकणात झालेली बदली. या सर्व अनपेक्षित बदलांना सामोरे जाताना त्या मुलाचे बदलणारे भावविश्व अतिशय प्रभावीपणे मांडले आहे या चित्रपटात.

हा मुलगा एकदम "good boy" या पठडीतला आहे हे सुरवातीलाच जाणवते. आईची घालमेल त्याला समजतेय. तिला जमेल तितके सांभाळून घ्यायचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण त्याचेही अल्लड वय आहे. लहानपण आणि तरुणपण यांच्या सीमारेषेवरील असलेले त्याचे मन हळुवार झाले आहे. नवीन शाळा, नवीन मित्र, त्यांची वेगळी भाषा, या सगळ्यांशी जुळवून घेता घेता काहीवेळा कोंडमारा होतो मनाचा. पण त्याबरोबरच परिस्थितीचा अबोल स्वीकार ही भावनाही कुठेतरी आईकडे बघता बघता जाणवतेय त्याला.

एके दिवशी तो आणि त्याचे नवीन मित्र गावाजवळच्या किल्ल्यापर्यंत सायकलची शर्यत लावतात. सर्वजण किल्ल्यावर पोचून मजेत दंगामस्ती करत असताना अचानक पाऊस सुरू होतो. हा मुलगा आणि त्याचे मित्र यांची चुकामूक होते. आणि काही काळ तो किल्ल्याच्या सानिध्यात एकटाच असतो.. कोसळणारा पाऊस अनुभवत. मग मित्रांबरोबरचा अबोला, पुन्हा जमलेली गट्टी आणि सर्व काही सुरळीत चाललेय असे वाटतं असतानाच आईची पुन्हा झालेली बदली. पुन्हा नवा गाव नवा देश आणि अर्थातच नवे अनुभव...

हे सगळे चित्रीकरण इतके सुरेख आहे की आपल्या आजूबाजूलाच ते घडतेय असे सारखे वाटत राहते. त्यातून कोकण आणि पाऊस.... इतके मुसळधार आणि हिरवेगार गारुड आहे ना चित्रपटभर की तोच एक अनुभव होऊन जातो. संवाद फारसे नाहीतच. भाषाही उगीचच अलंकारिक नाही. सगळा नजरेचा, आणि बदलणाऱ्या चेहऱ्यांचा खेळ. पण खरे आयुष्य तरी शब्दबंबाळ कुठे असते हो? ते तर अनेक निवांत आणि आश्वासक क्षणांमधूनच उलगडत जाते ना हळूवार...

नक्की बघा हा चित्रपट - अमृता सुभाषसाठी, छोटया चिन्मय साठी (अर्चित देवधर), त्याच्या मित्रांसाठी आणि हो, कोंकण आणि पावसासाठीसुद्धा !!!




 

Tuesday, February 16, 2016

मनातले कोकण...

नमस्कार,

सध्या नुसती धावपळ सुरु आहे. एका वेळी ४ प्रोजेक्ट्स वर काम करताना चांगलीच तारांबळ उडत आहे. मन दमून जातंय आणि लहान मुलासारखा ब्रेक मागतंय. पण कुठेही जाता येणार नाहीये इतक्यात. मग काय करायचे? सोप्पं आहे - मोबाईल वरील जुन्या सहलींचे फोटो बघायचे. आणि त्यातही ते कोकणातील फोटो असतील तर काय विचारूच नका - अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते.

माझे माहेर कोकणातील आहे म्हणूनही असेल कदाचित, पण किनारपट्टीवरील कोणत्याही ठिकाणी "I just feel home". एक "सुकून" मिळतो जीवाला. तो बेफाट निसर्ग, ते virgin समुद्रकिनारे, ती सुरेख देवळे, वाडीत लपलेली टुमदार घरे, त्या घरांच्या ओटी-पडवीत  घुटमळणाऱ्या गोजिरवाण्या मांजरी आणि आपल्या अंगभूत गोडव्याने सर्वांना आपलंसं करणारी कोकणी माणसे. छे… नुसत्या आठवणीनेही जीव कासावीस होतोय…
हे फोटो माझ्यासारख्याच कोंकणवेड्यांसाठी…
















 

Tuesday, February 9, 2016

The Happiness Project अर्थात आनंदाची पूर्वतयारी

नमस्कार,

गेल्या काही दिवसांपासून Gretchen Rubin या लेखिकेचे The Happiness Project  हे पुस्तक वाचत आहे. १२ महिने, १२ उद्दिष्टये, आणि त्यांची अंमलबजावणी असे काहीसे स्वरूप आहे या पुस्तकाचे.

एक ३६ वर्षाची स्त्री. प्रेमळ नवरा, दोन गुणी मुली, मनासारखे काम, सुंदर घर… सगळे कसे चौकटीतल्या चित्रासारखे. आणि एक दिवस तिला अचानक जाणवते - आपण असायला  हवे तितके आनंदी  होत नाही आजकाल. म्हणजे ही स्त्री खंतावलेली, निराश, उदास नाहीये बरं का, पण तिला अतिशय consciously, समजून उमजून आनंदी व्हायचे आहे. हातून निसटलेल्या गेलेल्या असंख्य आनंदी क्षणांबद्दल नंतर कधीतरी हळहळ व्यक्त करण्यापेक्षा सभोवताली असलेल्या सुखाची आताच प्रशंसा करायची आहे, ते साजरं करायचं आहे आणि त्याहूनही पुढे जाऊन येणारे क्षणही आनंदी कसे करता येतील, त्यादृष्टीने आपली मानसिकता कशी असावी लागेल या सगळ्याचाच साधकबाधक विचार करायचा आहे.  या आत्मपरिवर्तनाच्या दिशेने चालू झालेल्या तिच्या प्रवासाचे वर्णन म्हणजे हे पुस्तक.

खरंच आपण सगळेच किती धडपड करत असतो नं आनंदासाठी. आजूबाजूला पाहावे तर कस्तुरीमृगांची वर्दळ दिसते. सगळेच आनंदाच्या शोधात. कुणाला बारीक व्हायचे आहे तर कुणाला जाड. कुणाला थोडा अजून पैसा कमवायचाय, तर कोणाला हाती असलेला पैसा कसा वापरायचा हा प्रश्न. कोणाकडे वेळ नाही म्हणून खंत तर आणखी कोणीतरी हाती असलेल्या वेळाचे काय करायचे या चिंतेत. प्रत्येकालाच दुसऱ्या कुणासारखे तरी होऊन सुख मिळवायचे आहे. नं सरणारी तगमग… काहींच्या बाबतीत अगदी आयुष्य संपेपर्यंत !! आणि मग स्वतःशीच खंतावलेला संवाद -  " I would have been somebody".

खरंतर आपण या क्षणीही "somebody" आहोतच की. प्रश्न आहे तो हे स्वीकारण्याचा.  मला वाटते आनंदाचे diet plan सारखेच आहे. म्हणजे सगळ्यांच्या लेखी आनंदाची व्याख्या, आणि आनंदी व्हायची तत्वे साधारण सारखीच. खरी अडचण येते ती मनातल्या कल्पना प्रत्यक्षात आचरणात आणताना.

"how to be happy" असा Google सर्च केला तर साधारण ६३ कोटी लिंक्स दिसतात. किती मजेची गोष्ट आहे नं, खरंतर हवा, पाणी अन्न वस्त्र आणि निवारा यासारखाच आनंदी असणे हा ही आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तरीही तो मिळवणे हे कितीतरी लोकांसाठी सर्वात कठीण काम असते. असे तर नसेल नं कदाचित की माहितीच्या महापुरात आपला स्वतःशीच संवाद थांबलाय? सतत दुसऱ्या कुणासारखे तरी होण्याच्या प्रयत्नांमध्ये आपला मूळ आत्माच हरवलाय?

तुम्ही लहान मूल पाहिलेय का लक्ष देऊन? स्वतःमध्ये रममाण झालेले. अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचे ओझे या सर्वांपासून मुक्त… मोठे होत जाताना आपल्यामधील सहज, उपजत आनंद हळूहळू कसा कमी होत जातो नं.

हे पुस्तक एक निमित्त आहे माझ्यासाठी - आतमधील लहान मूल जोपासण्याचे. Leo Tolstoy म्हणतो त्याप्रमाणे " If you want to be happy, BE. " इतक्या सहजपणे आनंदी राहण्याचे… प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे नं सहजतेसाठी !!!


                                      




 

Tuesday, January 26, 2016

भारत माझा देश आहे…

नमस्कार,

सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा.

गेल्या शुक्रवारी "एअरलिफ्ट" बघायला गेलो होतो. सुन्दर… निव्वळ अप्रतिम…

मध्येच येणारी गाणी, इराकी जनरलचे थोडे खटकणारे हिन्दी आणि कदाचित आणखीनही काही दोष, या सर्वांना नजरेआड करूनही प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. कारण कुवेतच्या एम्बसी मध्ये भारताचा झेंडा फडकला जाताना डोळ्यात येणारे अश्रू त्या नायकाचे किंवा त्याच्याबरोबर इराकमध्ये अडकलेल्या दीड लाख लोकांचेच राहत नाहीत तर "आंखो से अश्क़ बनके जजबात बह राहा है " या ओळीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे होतात. तरुणाईने ओसंडून वाहणाऱ्या सिनेमागृहातूनही टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. "वन्दे मातरम" चा जयघोष होतो तेंव्हा देशभक्ती, देशप्रेम या मनाच्या कोपऱ्यात वसलेल्या पण एरव्ही निव्वळ पुस्तकी वाटणाऱ्या शब्दांना हिऱ्यांचे तेज चढते.

१९९० चा सुमार. आपली मातृभूमी सोडून पोटापाण्याच्या उद्योगासाठी कुवेत मध्ये गेलेले १७०००० भारतीय. त्यांच्या नाना तऱ्हा. "आपण कुवेती नागरिकच आहोत " या नकळतपणे उराशी बाळगलेल्या समजुतीला जोरदार ठेच लागते जेंव्हा सद्दाम हुसैन कुवेतवर लष्करी हल्ले चढवतो. सर्वप्रथम डोके वर काढतो तो स्वार्थ - मी आणि माझे कुटुंब यांची सुरक्षितता. या स्वार्थाचे रुपांतर हळूहळू एका उदात्त हेतूमध्ये कसे होते आणि मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याची सत्यकथा म्हणजे हा चित्रपट.

१७०००० नागरिक आणि सलग ५९ दिवस war-zone मध्ये ४८८ civil airplanes उडवून या नागरिकांची केलेली सुटका - जगातील सर्वात मोठे rescue operation !! त्यातील "रणजीत सन्याल ही व्यक्तीरेखा खरोखर अस्तित्वात आहे का ? या सर्व प्रकरणात शासकीय यंत्रणा कशी राबली?, भारत-कुवेत संबंध कसे होते? इतके लोक कॅम्पमध्ये एकत्र होते का?" हे सर्व प्रश्न निश्चित महत्वाचे आहेत पण त्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचे ठरते ते भारतीयत्व … आपली मायभूमी आपल्याला पंखाखाली घेईल हा यथार्थ विश्वास ! केवळ देशबांधवांच्या सुटकेसाठी प्राण पणाला लावून वैमानिकांनी केलेले धाडस !! आणि ही शौर्यकथा पडद्यावर पाहताना आपल्या भारतीय असल्याचा वाटलेला अभिमान !!!

असाच ऊर भरून आला आजचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन टीव्हीवर बघताना. काय वैविध्यपूर्ण आहे हो आपला देश ! एकीकडे हिमालयाची अजस्त्र भिंत तर दुसरीकडे महासागरांचा त्रिवेणी संगम. एकीकडे वाळूचे डोंगर तर दुसरीकडे डोळ्यांचे पारणे फिटवणारी हिरवाई.  किती जातीधर्माचे लोक आणि त्यांच्या अनेकविध चालीरीती. आपली शिल्पकला, हस्तकला, नृत्यसाधना, योगासने, चाणक्यनीती, या  सगळ्याची जगाला वर्षानुवर्षे पडलेली भुरळ. आपले शिष्टाचार, सहिष्णूता, आणि विविधतेमध्ये एकता… किती अनमोल खजिना आहे आपल्याकडे !! असे असतानाही जेंव्हा कोणी "मला देशाने काय दिले? " यासारखे प्रश्न उपस्थित करतात तेंव्हा मनात साहजिकच प्रश्न उमटतो की "आपण देशासाठी काय देत आहोत? " म्हणजे globalization, appreciating other cultures, food trends, quality वगैरे या कशालाही माझा विरोध नाहीये अर्थातच, पण अशी मुक्तपणे विचार करण्याची संधीही एक भारतीय असल्यामुळे मला सहज मिळतेय हे मात्र निश्चित विसरता येणार नाही. आणि शेवटी देश म्हणजे काय हो, त्या देशातील जनताच नं? मग आपण कोणता खारीचा वाटा उचलत आहोत आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये? आपण पाळतोय का वाहतुकीचे नियम? आपण नकार देतोय का लाच दयायला किंवा घ्यायला? आपण भरतोय का कर नियमितपणे? आपला आहे का सक्रिय सहभाग निवडणूक प्रक्रियेत? आपण परिसराची स्वच्छता राखण्यात लावतोय का हातभार? आपण जगवतोय का एकतरी झाड? अशा कितीतरी गोष्टी… प्रामाणिक इच्छा मात्र हवी.

चला तर, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी संकल्प केलाय एक इवलुसा - आपले विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ शोधून काढून ते माझ्या स्वयंपाकघरात रांधण्याचा… तुम्ही कोणता संकल्प करणार आहात?

वन्दे मातरम… !!

 
 
 
      
 




 

Tuesday, January 19, 2016

रंगूनी रंगात साऱ्या…. Fabian Oefner



नमस्कार,

माझ्या चिमुटभर वाचकांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा...

मागच्या पोस्ट नंतर कितीतरी वेळ गेला मध्ये. मनात विचार तर येतच होते पण ते ब्लॉगवर काही उतरत नव्हते. वेळाची वाळू हातातून कधी निसटली कळलंच नाही. आज लिहीन, उद्या नक्की लिहीन… शेवटी आज मुहूर्त लागला एकदाचा :)

तर, आजचा लेख एका रंगवेड्याला समर्पित. मध्यंतरी फेरारीची एक अप्रतिम advertisement YouTube वर पाहण्यात आली होती. त्यामधील photographer चे तंत्र, त्याने वापरलेली उत्कट रंगांची आरास, सगळे एकदम खिळवून ठेवणारे होते. त्या अवलियाचे नाव Fabian Oefner. मग थोडे खोलात शिरून शोध घेतला असता  त्याच्या Liquid Jewels, Orchid, आणि Black Hole या थीम्स वर आधारित फोटो सिरीजची माहिती मिळाली, आम्ही तर अगदी भारावून गेलो. किती ती उत्सुकता, मेहनत, अभ्यास आणि त्या सगळ्यांच्या परीपाकातून साधलेले precision.. निव्वळ अप्रतिम. खाली दिलेल्या लिंक्स नक्की बघा. तुम्हीही खात्रीने प्रेमात पडाल. :)

१) Photographing Natural Forces: https://www.youtube.com/watch?v=FAs6ILaXSPM

२) Ferrari: https://www.youtube.com/watch?v=2Cp-fpEYzB0

३) Psychedelic Science : https://www.youtube.com/watch?v=Mh3_wYHdeVs

     


  



 

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...